अमल - संदेश

Ganeshji.jpg

स्वामी अमलानंदांच्या विचारांचा व शिकवणुकीचा मागोवा घेणारे त्रैमासिक


       वर्ष २ रे       अंक ३      पेण       दिनांक ०१-०७-२०१३      प्रसादभेट  



॥ॐ अमलानंदाय नमः ॥


कैवारी सदया (लेखक - ‘ अमलसुत ’ तथा अनिल बेडेकर)


कोण तुजसम सांग मज गुरुराया । कैवारी सदया ॥
पाहिजे ते आंगी स्विकाराया । भवदुःख हराया ॥ धृ ॥
तुचि विष्णु तुचि शिव तू धाता । तू विश्वंभरता ॥ १ ॥
तुचि व्यापक व्याप्याते प्रसविता । तू मायेपरता ॥ २ ॥
तुचि शिष्या पोसणारी माता । तू विद्यादाता ॥ ३ ॥
तुचि देसी तत्त्वनिधी निजहाता । तारक बलवंता ॥ ४ ॥

हे पद आदरणीय अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या सौभद्र या नाटकामध्ये श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी लिहिले गेले. तो प्रसंगही मोठा विलक्षण आहे. श्रीकृष्णांनी आपले कुलगुरु गर्गमुनी यांना छद्मवेषधारी अर्जुनाचे माहात्म्य वाढविण्यासाठी विनंती केली होती. गर्गमुनींचा मोठेपणा एवढा, की साधुच्या वेषामध्ये अर्जुन आहे हे माहीत असूनसुद्धा गर्गमुनींनी अर्जुनास साष्टांग दंडवत घातला. ही हकीकत समजल्यावर कृष्णाला भरून आले आणि आपल्या सद्गुरुंचे महात्म्य वर्णन करण्यासाठी त्याने हे पद म्हंटले आहे.

हे पद सद्गुरुंच्या महात्म्याचे आणि ते शिष्याच्या घेत असलेल्या कैवाराचे यथार्थ वर्णन करणारे असल्यामुळे नाथपंथी सत्पुरुष स्वामी स्वरूपानंद (पावस) यांना अतिशय आवडत असे. त्यामुळे स्वामींचे श्वास आणि उच्छवासही आपल्या हृदयामध्ये साठविणारे त्यांचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ शिष्योत्तम स्वामी अमलानंदांनाही हे पद अतिशय आवडत असे यात आश्चर्य नाही. संगीतभूषण रामभाऊ मराठ्यांनी आपल्या जोमदार आवाजात गायलेले हे पद ऐकताना उभय स्वामीद्वयांची भावसमाधी लागत असे. आपल्या सद्गुरुंचे स्मरण झाल्यामुळे भावविभोर झालेल्या स्वामी अमलानंदांच्या दर्शनसुखाचा लाभ आम्हा शिष्यांना अनेकवेळा झाला आहे. आदरणीय अण्णासाहेब किर्लोस्कर हे नाथपंथी सत्पुरुष रामचंद्रमहाराज तिकोटेकर यांचे सत्शिष्य होते , हा नाथपंथाशी जोडणारा आणखी एक दुवा.

‘ कोण तुजसम सांग मज गुरुराया ’ या पृच्छेमध्ये ‘तुजसम तूच’ हा भाव आहे.तुझ्याशिवाय देवयोनीमध्येही शिष्यकैवारी, शिष्यावर अहेतुक प्रेम करणारा, त्याच्या अभ्युदयासाठी सदैव झटणारा या विश्वामध्ये कोणीही नाही हा भाव येथे आहे. ‘ घेसी तेव्हा देसी ऐसा । अससी तू उदार ॥’ हे पांडुरंगाचे नामदेवमहाराजांनी केलेले वर्णन सुप्रसिद्धच आहे. आपले स्वात्मज्ञान शिष्याला देणारा व त्याच्याकडून कसलीही अपेक्षा न करणारा असे सद्गुरुंचे वर्णन एकनाथ महाराजांनी नाथ भागवतात केले आहे. ते म्हणतात,- ‘शिष्यापासुनी सेवा घेणे । हे स्वप्नीही न स्मरे मने । शिष्याची सेवा स्वये करणे । पूज्यत्वे पहाणे निजशिष्या ॥ आणि म्हणूनच तुझ्यासारखा ‘तुकीता तुका’ या विश्वात कोणीही नाही असे आत्मानुभवाचे उद्गार ठासून काढले आहेत.

कैवारी सदया

कैवारी सदया हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत.कैवारी या शब्दाचा अर्थ कैवार घेणारा,बाजू घेणारा, हा तर सर्वश्रुतच आहे. परंतु कैवारी या शब्दाचा खरा अर्थ पक्षपाती असा आहे. आणि पक्षपाती याचा अर्थ शिष्यांच्या चुकांकडे मोठ्या मनाने दुर्लक्ष करून त्यांचा सांभाळ, प्रतिपाळ करणारा असा होतो.आणि जे गुरुपदिष्ट आहेत ,त्यांना याचा सतत अनुव येतच असतो.अन्यथा आम्ही असे काय गुणसागर लागून गेलो होतो की सद्गुरुंनी आम्हाला स्वात्मज्ञान द्यावे ? आमच्या चुका, आमचे अज्ञान,आमचे षड्रिपुंना शरण जाणे हे सर्व मातेच्या ममतेने पोटात घालून ते आम्हाला सांभाळून घेतात,आमचे पालन पोषण करतात आणि आम्हाला हळुवारपणे हाताला धरून सन्मार्गावर पुरःसर करतात ह्या त्यांच्या मोठेपणाला तोड नाही. श्रीकृष्णाला सांभाळून घेण्याठी गर्गमुनींनी मनाचा मोठेपणा दाखवून श्रीकृष्णाचा खोटेपणाही पदराआड केला. पुढे श्रीकृष्णांनीही युद्धप्रसंगी अर्जुनाला सांभाळून घेण्यासाठी काय काय कसरती केल्या हे सर्वश्रूतच आहे. एकदा सद्गुरुंनी शिष्याचा अंगिकार केला की त्याला पैलपावेतो सोडत नाहीत. प.पू.स्वामी अमलानंद ‘ एकदफे शेंडी पकडा तो छोडनेका बात नही’ असे विनोदाने बोलत असत आणि खरोखर माझाही तोच अनुभव आहे. मी स्वामी अमलानंदांकडे काही कामानिमित्त अनुग्रह मिळण्याआधी जवळ जवळ १४ वर्षे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी ‘ तुम्हाला काय पाहिजे ते द्यायला मी तयार आहे, फक्त सांगा.’ असे म्हंटले होते. अज्ञानवश त्याचा अर्थ समजण्याची माझी अजिबात पात्रता नव्हती. मी त्यांना म्हंटले की माझ्यासाठी काही मागण्यासाठी मी येथे आलो नाही.मला पाहिजे ते मी माझ्या कर्तृत्वावर मिळवीन. “ करंट्यासी कैसे । प्राप्तीचिया वेळे । लागती डोहाळे। अंधत्वाचे ॥ असते नयन । घेतसे झाकोन । मुके तो म्हणोन । वस्तुलाभा ॥( अभंग ज्ञानेश्वरी ) ब्रह्मप्राप्तीला वस्तुप्राप्तीही म्हणतात हे येथे लक्षात ठेवावे.स्वामी द्यायला तयार आहेत पण मी करंटा त्याचा स्विकार करायला तयार नाही अशी उफराटी अवस्था होती.त्यानंतर उपरती व्हायला चौदा वर्षांचा काळ जायला लागला.कापरासारखे अग्नीचा स्पर्श होताच पेट घेणारे विरळा. गोवरीसारखे धुमसणारेच अनेक.पण सद्गुरुंनी संकल्पाने जे बीजारोपण केले, त्याने आपले काम चोख केले.तेथे त्याच्या आड माझा उद्दामपणा आला नाही.खरोखर सद्गुरुकृपेला तोड नाही.

बहुधा आपण लहान मुलांच्या खोड्यांकडे, हट्टाकडे दुर्लक्ष करतो तोच भाव सद्गुरुंचा असावा. अशी अनेक उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंसांना वेडाच समजत होते. विस्तारभयास्तव आणखी उदाहरणे देत नाही.स्वतःच्या अंतरात डोकावले तरी याचा प्रत्यय येईल. सदया हा शब्द देखिल सद्गुरुंचा मोठेपणा दाखविणारा आहे. दया हा शब्दच कृपावाचक आहे. शिष्यांच्या बाबतीत दया,क्षमा व कृपा हेच शब्द सद्गुरुंना माहित असतात.अज्ञानवश सद्गुरुंचे मोठेपण न ओळखून त्यांच्या इच्छेच्या,आज्ञेच्या विरुद्ध वागलेल्या कितीतरी शिष्यांना मोठ्या मनाने क्षमा करून,त्यांच्या चुका पदरात घेऊन त्यांना परत सन्मार्गावर आणलेली उदाहरणे मला माहित आहेत.अनेक ग्रंथांमधुनही याचे उल्लेख आलेले आहेत.

पाहिजे ते आंगी स्विकाराया । भवदुःख हराया

‘ म्हणती साधने केली अनेक । तैसे सद्गुरुही साधन एक । म्हणता मुमुक्षु झाला मूर्ख । नागवला जाण सर्वस्वे ॥ ’( ए..भागवत )

सद्गुरुंनी कृपा केली तरीसुद्धा त्याची योग्य जाणीव ठेऊन त्या कृपेला अभिमुख होणे हे शिष्याचे कर्तव्य आहे.सद्गुरुंनी आपल्यावर केलेल्या कृपेचे मूल्यच आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना त्या कृपेला मोजमापच नाही याचे भान आपल्याला नसते. आणि मग त्यांनी दिलेल्या अमोघ ज्ञानाचे आपल्या हातून अवमूल्यन होते.तसे होऊ नये म्हणून त्यांच्या त्या अमृतमय कृपेचा कृतज्ञ बुद्धीने आपण स्विकार करावयास हवा.आपल्या बुद्धीमध्ये आवश्यक असा बदल सद्गुरु घडवून आणतातच,मातीच्या गोळ्याला गणपतीचा आकार देतातच, परंतु यामध्ये अनावश्यक असा आपला बहुमूल्य वेळ वाया जातो.आधी मुळात परमार्थाचे भान येण्यात अनेकानेक वर्षे जातात. ते आल्यावरही महापुरुष संश्रय मिळण्यात अनेक वर्षे जातात. म्हणूनच सद्गुरुंची कृपा आंगी स्विकारण्यासाठी त्याची पूर्ण जाणीव असणे अत्यावश्यक आहे. ‘ पुनरपि जननम् पुनरपि मरणम् । पुनरपि जननी जठरे शयनम् ॥ हेच सर्वात मोठे भवदुःख आहे, आणि त्या दुःखावर रामबाण इलाज म्हणजे स्वरूपाचे भान येणे आणि हे कार्य फक्त सद्गुरुच करू शकतात. यासाठीच पांडुरंगाने ‘ जाई नाम्या जाई संतांसी शरण । ’ असा नामदेवांना उपदेश केला होता. हे भवदुःख ‘ तत्त्वमसि ’ चा उपदेश करून हरण्याचे सामर्थ्य फक्त सद्गुरुंनाच आहे. ‘ सद्गुरुविण ब्रह्मज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण । हे उपनिषदर्थे प्रमाण । परम निर्वाण साधिजे ॥ ( ए. . भागवत ) ‘ ग्रंथ हेच गुरु ’ अशा वचनातील लक्ष्यार्थ आपण समजून घेतला पाहिजे. तसेच सद्गुरु आणि गुरु यातील फरकही जाणून घेतला पाहिजे.त्या दृष्टीने दासबोधातील गुरुंची यादी देखिल डोळ्याखालून घातली पाहिजे. ‘ पंडितेनापि स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणं न कुर्यात ’ असे शांकर भाष्यात म्हंटले आहे. शब्दज्ञान्यांनीसुद्धा स्वतंत्रपणे ब्रह्मप्राप्तीचा प्रयत्न करू नये असे अद्वैतसिद्धांताचा ध्वज चारी दिशांना फडकविणाऱ्या आद्य शंकराचार्यांनी म्हंटले आहे.

तुचि विष्णु तुचि शिव तू धाता । तू विश्वंभरता

सद्गुरु हे साक्षात् परब्रह्म असल्यामुळे शिष्याच्या बाबतीत ब्रह्मा,विष्णु आणि महेशाचे कार्य एकत्रितपणे करू शकतात. एकनाथी भागवतात गुरुने शिष्याचा अंगिकार करण्याला शिष्याचा नवा जन्मच मानला आहे. कारण श्रीगुरुंनी अंगिकार केल्यानंतर शिष्यामध्ये हमखास परिवर्तन होते. जसे विरजण लावल्यावर दूध आपल्या मूळ रूपाला मुकते आणि नवे रूप धारण करते त्याप्रमाणे शिष्याचा जीवभाव गुरु हरण करतात आणि नवीन शिवभाव त्याच्यामध्ये प्रविष्ट करतात. तो सोऽहं भावामध्ये रममाण होतो. ‘ अरे तू कोण कोणाचा । कोठोनि आलासी कैचा । ’ या आत्माराम ग्रंथातील प्रश्नाचे उत्तर त्याला सद्गुरुंच्या सान्निध्यामुळे मिळते. स्वामी अमलानंदांच्या जन्मोत्सवाच्या पाळण्यामध्ये ‘ कोहं सोऽहं प्रश्न उद्याचे । सद्गुरु मिळता सुटतील साचे । तोवरी निद्रा घेई बाळा । जोजविते मी तुज वेल्हाळा ॥ जागृती स्वप्न ठेवि बाजुला । भोगी तोवरी सुषुप्तीला । लक्षुमणा त्या स्वानंदाला । चिकटुनी ठेवि सतत मनाला ॥’ असे म्हंटले आहे. हे ब्रह्माचे सृजन कार्य होय. शिष्याला जन्म दिल्यानंतर त्याचे पालनपोषण, संवर्धन हे विष्णुचे कार्यही सद्गुरु मातेच्या ममतेने करतात. शिष्याच्या जीवभावाचा नाश करून ‘ चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं ’ याची अनुभूती देऊन महेशाचेही कार्य करतात. विश्वंभरा म्हणजे पृथ्वी. विश्वंभर म्हणजे म्हणजे या चराचर सृष्टीचा पालक. या विश्वाला विश्वरूप प्राप्त करून देणारा, या विश्वाचे सृजन, पालनपोषण आणि विनाश घडवून आणणारा विश्वस्त.

तुचि व्यापक व्याप्याते प्रसविता । तू मायेपरता

व्यापक, व्याप,व्याप्य ही त्रिपुटी आहे. व्यापकचा अर्थ All pervading, सर्वव्यापी असा आहे. ब्रह्म नाही अशी जागा दाखविताच येणार नाही. साधक-शिष्यांमध्ये ब्रह्म आहे म्हणूनच सोऽहं भावाने गुरुकृपेने तो गुरुमय म्हणजेच ब्रह्ममय होऊ शकतो. सद्गुरु हे परब्रह्म आहेत म्हणूनच ते चराचरामध्ये सामावले आहेत.व्याप या शब्दाचा व्यवहारामध्ये जो अर्थ आहे तोच येथेही आहे. व्यवहारात जसे आपण संसार वाढवतो ( आणि पस्तावतो ) तसेच मायोपाधित ब्रह्म मायेच्या सहाय्याने अनंतकोटी ब्रह्मांडाचा पसारा वाढवित असते. ही अनंतकोटी ब्रह्मांडे म्हणजेच व्याप्य. मायोपाधित ब्रह्म असे आपण आपल्या बुद्धीने आपल्याला जसे जाणवते तसे म्हणतो. वस्तुतः ब्रह्माला मायेची उपाधी होऊच शकत नाही. आकाशात ढग आले किंवा सूर्यापुढे चंद्र आला म्हणजे आपण ‘ नभ मेघांनी आक्रमिले ’ किंवा सूर्यग्रहण झाले असे म्हणतो. खरे तर नभ अस्पर्श असते आणि ग्रहणातही सूर्य त्याच्या बारा कलांनी प्रकाशतच असतो, त्यामुळे त्याला सृष्टीचा पालनकर्ता असे म्हणतात. पण तो ही उपाधी अंगाला लावून घेतच नाही. अंधार त्याने कधी पाहिलाच नाही तर तो दूर करण्याचा प्रश्नच कुठे येतो ? आपण भले त्याला तमारि वगैरे विशेषणे लावू. सत् , चित् , आनंद यांचाही ज्याला विटाळ होतो ते ब्रह्म कधीतरी मायोपाधित होऊ शकेल काय ? त्या दृष्टीनेच सद्गुरुंना मायेपरता म्हणजे मायेच्या पलीकडला, मायेचा स्पर्शही होऊ न शकणारा असे म्हंटले आहे. मायोपाधित हे विशेषण साधकांना समजावे म्हणून वापरले आहे. सिद्धसिद्धांत पद्धति ग्रंथामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये-

‘ नास्ति सत्यविचारेऽस्मिन्नुत्पत्तिश्चांडपिण्डयोः । तथापि लोकवृत्यर्थं वक्ष्ये सत्संप्रदायतः ॥ ’ असे म्हंटले आहे. .

अर्थः- या सत्य विचारामध्ये जरी अंडपिंडांची ( मायेची ) उत्पत्ती संभवत नाही तरी लोकव्यवहारासाठी महासिद्धांच्या संप्रदायाचे वर्णन मी करीत आहे , अशी अजातवादाची भाषा केली आहे. संतांनी सुद्धा ‘ अगा जे घडलेचि नाही । त्याची वार्ता पुससी काई ? ’ असे म्हंटले आहे.

तुचि शिष्या पोसणारी माता । तू विद्यादाता ॥ ३ ॥
तुचि देसी तत्त्वनिधी निजहाता । तारक बलवंता ॥ ४ ॥

शिष्याचे मातेच्या ममतेने पालनपोषण , संवर्धन करणारा म्हणून सद्गुरुचे वर्णन आधी आलेलेच आहे . येथे विद्यादाता हा शब्द महत्त्वाचा आहे. अध्यात्मशास्त्राप्रमाणे विद्या हा शब्द फक्त ब्रह्मविद्येच्या संदर्भात वापरला जातो. जीवाला शिवत्वाकडे , मर्त्याला अमृततत्त्वाकडे नेणारी असा याचा अर्थ आहे. इतर सर्व विद्या या अविद्येच्या प्रकारात मोडतात. मुंडकोपनिषदात चार वेद , शिक्षा , कल्प , व्याकरण , निरुक्त , छंद व ज्योतिष या अपरा विद्या आणि जिच्या योगाने अमृततत्त्व प्राप्त होते ती परा विद्या असे म्हंटले आहे . ( मुंडक-१.५ ) ही विद्या फक्त सद्गुरुच प्रदान करू शकतात म्हणून विद्यादाता हे विशेषण फक्त सद्गुरुंनाच लावता येते . सर्व संत महंतांनी याच विद्येला सर्वश्रेष्ठ मानले आहे. आमचे सद्गुरु स्वामी अमलानंद तर मोठ्या आर्ततेने ‘ यारे सारे लहानथोर , धन्याचा माल लुटा. ’ असे आत्मियतेने म्हणत असत . परंतु ‘ पाहिजे ते आंगी स्विकाराया ’ असे या काव्यात म्हंटले आहे तेच खरे . सद्गुरुच हे सारे करण्याला समर्थ आहेत म्हणून त्यांना तारक बलवंता म्हंटले आहे . स्वामी अमलानंदांना बालपणी बलवंता असे म्हणत हे अमलभक्तांना सुखविणारे आहे .

अशा या नितांत सुंदर काव्याचे पदर काही प्रमाणात उकलण्याचे भाग्य माझ्या पदरात घातले , मला माध्यम बनविले त्यासाठी मी स्वामी अमलानंदांच्या चरणापाशी कृतज्ञताबुद्धीने कायमचा राहू इच्छितो .

ज्याच्या हाती पतंगाची दोरी । तोचि गती देई साजिरी । आपुल्या प्रयत्ने खरी । हे आपण जाणतसा ॥ उडविणारा स्वरूपानंद । दोरी असे अमलानंद । परी उडण्याचा आनंद । मिळतसे अमलसुता ॥


ॐ तत्सत् स्वामी अमलानंदार्पणमस्तु । शुभंभवतु ॥


प.पू. स्वामी अमलानंदांच्या प्रयाणाला या वर्षी २५ वर्षे व प.पू. मामींच्या प्रयाणाला ९ वर्षे पूर्ण झाली. स्वामी गेल्याला दोन तपे उलटून गेली, तरी त्यांच्या सत्शिष्यांच्या मनोमंदिरात त्यांची प्रतिमा नित्य नवी आणि प्रेरणादायी अशीच आहे. गेली काही वर्षे हा सोहोळा प.पू. स्वामी स्वरूपानंद व प.पू. स्वामी अमलानंद स्वाध्याय सेवा मंडळ पुणे . या न्यासाच्या विद्यमाने साजरा होत आहे . स्वामींच्या २५ व्या स्मृतिदनाचे औचित्य साधून या वर्षी या सोहोळ्याचे आयोजन दोन दिवस करण्यात आले . त्यानुसार हा भव्य सोहोळा शनिवार दिनांक २० व रविवार दिनांक २१-०४-२०१३ या दोन्ही दिवशी अत्यंत उत्साहाने पार पडला.पहिल्या दिवशी गुरुपीठ स्थापना झाल्यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे साधना-उपासनेचे कार्यक्रम झाले. सर्व कार्यक्रमास साधकवर्ग उत्साहाने व चढत्या वाढत्या संख्येने उपस्थित होता.

यानंतर कु.मृण्मयी स्वानंद जोशी या बालगायिकेचा अभंग गायनाचा कार्यक्रम झाला. हिचाच कार्यक्रम प.पू. स्वामी अमलानंदांच्या जन्मोत्सवामध्येही झाला होता याचे वाचकांना स्मरण असेलच . बालसुलभ गोड आवाज व चांगली तयारी यामुळे हा कार्यक्रम श्रोत्यांना फारच भावला. हिच्या व साथीदारांच्या यथोचित सत्कारानंतर सकाळचे हे सत्र संपले.

सायंकाळी ४.३० ते ६.०० प्रसिद्ध शिक्षणतज्ञ , विचारवंत व माजी प्र. कुलगुरु डॉ.शं.ना. नवलगुंदकर यांचे आजच्या पिढीला अत्यंत गरजेचे असलेले व मार्गदर्शनपर ‘ मातृ-पित्रुदेवो भव ’ या विषयावर व्याख्यान झाले . हिंदू संस्कृतीमध्ये मातापित्यांचे असलेले असामान्य स्थान व ही संस्कृती जपण्याची काळाची गरज यावर त्यांनी आपले विचार सडेतोडपणे पण खुसखुशीत विनोदप्रचूर भाषेत मांडले . सर्व श्रोत्यांना त्यांचे व्याख्यान मनापासून आवडले. यानंतर स्वामी प्रज्ञानंद तथा प्रा.म.अ.कुलकर्णी यांच्या ‘ विवेके देवास धुंडावे ’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.शं.ना. नवलगुंदकर यांच्या शुभहस्ते झाले .त्यांनी या पुस्तकाची रूपरेषा व प्रयोजन या विषयी माहिती दिली. डॉ.नवलगुंदकरांचा आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा यथोचित सत्कार झाल्यावर हा कार्यक्रम संपला .

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सौ. मानसी व श्री. श्रेयस बडवे यांच्या दिलखुलास भांडणाने झाला . कीर्तन जुगलबंदी ( की युगलबंदी ? ) या गोंडस नावाखाली या पती-पत्नीने मनापासून भांडून घेतले . उत्तम गायन , अभिनय , विषय मांडण्याची हातोटी व विषयावरील प्रभुत्व यामुळे ही जुगलबंदी कमालीची यशस्वी झाली . देव श्रेष्ठ की भक्त या दोन्ही बाजू उभयतांनी समर्थपणे अतिशय समरसून मांडल्या . सकाळी ११ ते दुपारी १.३० अशी ही जुगलबंदी एवढी रंगली की भोजनाच्या घमघमाटानेसुद्धा श्रोते विचलीत झाले नाहीत. अप्रतीम हा एकच शब्द या कार्यक्रमाचे वर्णन करण्यास योग्य ठरावा . कुठलाही कार्यक्रम उत्तम साथीशिवाय यशस्वी होत नाही याचे प्रत्यंतर या कार्यक्रमातही आले . सर्वच साथीदारांनी सुयोग्य साथ कसदारपणे केली . संवादिनीवर सौ.मधुराताई बडवे आणि पेणचे सदाबहार संवादिनीपटु श्री.अशोकराव देव, तबल्यावर श्री.सिद्धीविनायक पैठणकर पुणे, व पखवाजावर मृदंगमणि श्री. नंदकुमार भांडवलकर यांनी अतिशय समर्थपणे समरसून साथ केली .सर्व कलाकारांच्या यथायोग्य सन्मानानंतर हा हृदयंगम कार्यक्रम संपला.

दुपारच्या सत्रामध्ये किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित जयतीर्थ मेवंडी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला . त्यांनी पटदीप रागातील मध्यलय त्रितालातील बंदिशीने गायनाची सुरवात केली . संथ आलापी, उत्तम रागज्ञान, तयारीच्या ताना आणि स्वरबंध यामुळे हा राग उत्तरोत्तर वठत गेला . त्यानंतर त्यांनी सदाबहार ठुमरी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली . यानंतर भजनमांदुसातील एकेक भजन कार्यक्रमाची रंगत वाढवीत गेले . सोनेपे सुहागा किंवा दुधात साखर जशी मूळ वस्तुची किंमत वाढविते तसे या अभंगगायनाला कीर्तनकार श्री.श्रेयस बडवे यांच्या अभंगाचा अर्थ सांगणाऱ्या निवेदनाची जोड मिळाल्यामुळे हा कार्यक्रम विशेष रंगत गेला . उत्तम साथीशिवाय कुठल्याच कार्यक्रमाची गोडी वाढत नाही हे वर म्हंटलेच आहे . या चिरस्मरणीय कार्यक्रमाला संवादिनीवर श्री उदय कुलकर्णी यांनी उत्तम साथ केली. तबलासाथ श्री प्रशांत पांडव यांनी केली. यांच्या साथीचे वैशिष्ट्य म्हणजे गायकाच्या स्वरलिपीबरहुकुम ते स्वर तबल्यावर काढण्याचा यशस्वी प्रयत्न. त्यामुळे गाण्याची रंगत फारच वाढली . पखवाजावर श्री.नंदकुमार भांडवलकर यांनी उत्तम साथ केली . अभंगगायनात टाळांची जोड ही आवश्यकच असते. संत नामदेवांनी या टाळांचे महत्व एका अभंगात विषद केले आहे . ‘ लागोनिया पाया । विनवितो तुम्हाला । करी टाळ बोला । मुखी नाम विठ्ठलाचे ॥ या अभंगगायनाची खुमारी वाढविणारे , पंडित भीमसेन जोशींच्या गायनात अखंड साथ करणारे टाळकरी श्री. माऊली टाकळकर या कार्यक्रमाला लाभल्यामुळे गायनाची अवीट गोडी चिरस्मरणीय झाली .पं. जयतीर्थ मेवुंडी व त्यांच्या साथीदारांच्या स्वामी प्रज्ञानंदांनी केलेल्या यथोचित सत्कारानंतर हा कार्यक्रम संपला .

यानंतर पारंपारीक आरत्या व जयजयकारानंतर हा दोन दिवसांचा हृद्य कार्यक्रम संपला .




मालक।प्रकाशक- प.पू. स्वामी अमलानंद पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट, पेण.संपादक ‘अमलसुत’ तथा अनिल बेडेकर भ्रमणध्वनी . 9594239778.
व्यवस्थापन- डॉ.सुधीर लोमटे , भ्रमणध्वनी 919029055649. पत्ता- स्वामी अमलानंद स्मृतीधाम , चावडी नाका ,पेण,रायगड.